प्रेमकथेची जादू......



सिक्वेल - भाग दुसरा  हा प्रकार आपल्याकडे फार क्वचितच चाललेला. पण जेव्हा मुंबई पुणे मुंबई या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा सुरु झाली तेव्हा चाहत्यांनी एकच कल्लोळ माजवून दिला. 

एखाद्या सिनेमाच्या मागे चाहत्यांचं इतकं प्रेम असावं ही खरं तर भाग्याची गोष्ट. पण त्या बरोबरच येते, एक जबाबदारी, त्याचा पुढचा भाग बनवताना. आणि प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचं Challenge सुद्धा.  




मुंबई - पुणे - मुंबई  २  या सिनेमाने या सगळ्या अपेक्षांची पूर्तता केली. चित्रपट अत्यंत यशस्वीरीत्या सिनेमागृहात जोमाने चालू आहे, हीच त्याची पावती. 

सिनेमा कसा बनतो ? त्याच्यामागे किती लोक, काय काय, कष्ट घेत असतात, याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. मुंबई पुणे मुंबई २ बनत होता त्यावेळी आमच्या घरात त्याची लेखिका बसलेली असल्याने, सिनेमाची प्रोसेस मला फार जवळून पाहता आली. काय असते ही प्रोसेस

लेखक / लेखिका कथा लिहितात. दिग्दर्शक आणि लेखक मिळून त्याची पटकथा फायनल करतात. मग त्यावर संवाद लिहिले जातात. कथेनुरूप गाणी लिहिली जातात. ती गायली जातात. अभिनेते अभिनेत्री संवाद म्हणतात, आणि पडद्यावर चित्रपट जिवंत करतात. मग तो एडीट होतो आणि शेवटी आपण सिनेमागृहात जाऊन तो पाहतो.....

या सगळ्यात, अनेक लोकांचा घाम असतो...मेहेनत असते. अपार श्रम असतात. सिनेमाच्या शेवटी थांबून आपण त्यांची नावे पण वाचत नाही.....ही सगळी ग्रेट मंडळी; त्यांना म्हणे आधीच चित्रपट दिसतो.  नंतर ते तो फक्त Execute  करतात. ही फिल्म मेकिंग ची प्रोसेस फारच सही असते यात वाद नाही. 




मुंबई पुणे मुंबई २ - लग्नाला यायचंच !!!! दिग्दर्शित केलाय सतीश राजवाडे याच्यासारख्या एका हुशार माणसाने. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्याने कथानक जिवंत केलय. Hatts Off !!!! 

स्वप्नील जोशीने मागील भागात साकारलेला गौतम नेमका पकडलाय इथे. थोडासा Matured गौतम पाहायला खूप मजा येते. प्रशांत दामले यांचं टायमिंग, या बद्दल काय बोलावं? ते बादशाह आहेत, आणि बादशाह सारखेच वावरलेत फिल्म मध्ये. मंगल केंकरे आणि सविता प्रभुणे - अनुक्रमे मुलाची आणि मुलीची आई. सोज्वळ आणि प्रत्येक मध्यमवर्गीय घरातल्या आईसारख्या वाटल्या. विजय केंकरे यांनी साकारलेले मुलीचे वडील सुद्धा अप्रतिम, प्रसंगी मुलीच्या बाजूने उभे राहिलेले आजच्या काळात पटतील असेच. 

आणि मुक्ता बर्वेने वठवलेली Confused गौरी......




या सर्वांनी आपापल्या अनुभवाच्या पलीकडे जाऊन चित्रपटात अनेक सुंदर रंग भरले आहेत.....

सुरेख चित्रण, सुरेल संगीत, उत्तम अभिनय, नेटकं दिग्दर्शन यांच्या जोडीला एक महत्वाचा घटक म्हणजे या सिनेमातले संवाद. अश्विनीने स्वत:च्या लिखाणापलीकडे जाऊन संवाद साकारले आहेत. कॉलेजपासून INT सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये अभिनय केल्यामुळे तिला या माध्यमाची चांगली कल्पना होती. तरीही पहिलाच सिनेमा आणि तोही इतका कठीण व नाजूक विषय हाताळताना संवादात खूप नेमकेपणा आणण्यात ती यशस्वी झाली आहे. 




या सगळ्यात सतीशचे आभार मानायला हवेत, त्यांने अश्विनी वर टाकलेल्या विश्वासाबद्दल. पहिली पायरी अतिशय महत्वाची असते. अश्विनीला या पहिल्या पायरीवर सतीश सारखा दिग्दर्शक मिळावा ही खूपच सुखद बाब आहे.

मराठी सिनेमाच्या गगन भरारी मध्ये "मुंबई - पुणे - मुंबई २ " ने मानाचा तुरा खोवला आहेच, तरी मराठी सिनेसृष्टीची ही वाटचाल अधिकाधिक मनोरंजक होत जावो हीच सदिच्छा !!!!!!



टिप्पण्या