ध्वनिमुद्रणाची अद्भुत दुनिया !!!!!




सुरांच्या दुनियेत, अद्भुत गोष्टी घडतच असतात. अगदी कायम. आणि त्यांना काही सुमार नसतो कारण ते विश्वच अद्भुत असतं. जुन्या जमान्यात तर असे अनेक अद्भुत सुराविष्कार घडलेत, ज्यांची प्रचिती आजही आपल्याला त्या सोनेरी काळाचं संगीत ऐकताना येते.

म्हणजे काय ? का - प्रत्येक वेळी,  जुनी गाणी ऐकल्यावर आपल्याला मस्त वाटतं ? का  - त्या गाण्यांचा आपल्यावर दूरगामी परिणाम होतो ? मला अनेकदा लोक विचारतात की असं काय आहे त्या गाण्यांमध्ये,
 जे नेहेमी भावतं - आवडतं - लक्षात रहातं ?

याचं उत्तर सोप्पं आहे. तो काळ विलक्षण शांततेचा होता. लोकांमध्ये ऊर्जा होतीच पण लोक शांत होती, समाधानी होती. आणि म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक कलाकृती आपल्याला समाधान देऊ शकते अगदी आजही, कित्येक वर्षांनंतर सुद्धा. अजून एक गोष्ट जी त्या काळाकडे होती ती म्हणजे अत्यल्प तंत्रज्ञान. आणि त्यामुळे संगीत क्षेत्राचा पाया माणसांच्या कलेने आणि चिकाटीने रचला गेला.

कशाबद्दल बोलतोय मी ? जुन्या जमान्यातील ध्वनिमुद्रण या विषयावर बोलतोय. का? कारण विशेष आहे. आधी जुन्या जमान्यात ध्वनिमुद्रण कसं होत असे ते जाणून घेऊया.

अगदी सुरुवातीला म्हणजे चित्रपट बनू लागले तेव्हा तर, नायक - नायिका अभिनयाबरोबर गाणं गायचे, आणि सीन चित्रित होत असताना झाडाझुडपात लपून वादक वाजवायचे, पार्श्वसंगीताचा जेव्हा उगम झाला तेव्हा गायक - गायिका स्टुडिओ मध्ये येऊन गायला लागले. तेव्हा गाणी मॅग्नेटिक टेप किंवा स्पूल वर रेकॉर्ड होत असत. आणि पद्धत अशी होती की, गीतकार गीत लिहीत, संगीतकार त्यावर चाल बांधत असत, मग संगीत संयोजन म्हणजे वाद्यमेळ  ठरवला जात असे. ज्याला आपण ‘Music Arrangement’ असं म्हणतो. या वाद्यमेळाप्रमाणे जितके वादक लागतील तितके बोलावले जात असत. संगीत संयोजक किंवा स्वतः संगीतकार त्यांना गाण्याचं नोटेशन समजावत / शिकवत. त्यानंतर तालमी व्हायच्या. कधी कधी अनेक दिवस, कधी अनेक महिने सुद्धा ! या सगळ्या तालमींना गायक गायिका उपस्थित असत त्यांचा सहभाग सुद्धा असे. अश्या प्रकारे एक गाणं अनेक वेळा तयार केल्यावर एक दिवस त्याचं ध्वनिमुद्रण होत असे. त्यातही स्पूल ची टेप महाग असल्याने सगळ्यांनी एकत्रित पणे अचूक आणि प्रभावी काम करणे अपेक्षित असायचे.





आणि हे सगळे महान कलावंत, हा सगळा प्रपंच प्रत्येक फिल्म च्या गाण्यांसाठी लीलया करायचे. आता मला सांगा की अशा पद्धतीने केलेलं काम "अजरामर" का होणार नाही? ती प्रत्येक गाणी,  त्या प्रत्येक कलाकाराच्या अंगात भिनलेली असल्यानेच त्याचा एकत्रित प्रभाव पडतो. आणि ते गाणं इतक्या प्रभावीपणे आपल्या मनात रुजतं. त्या काळातल्या लोकांनी स्वतःला झोकून देऊन इतकं  उत्तम काम करून ठेवलंय. त्या काळात जन्म घ्यावासा वाटतोय, का? अहो कारण आत्ता असं काम होत नाही. आम्ही तंत्रज्ञानाचे शिलेदार आहोत, त्यामुळे डिजिटल जगात गाणं खूप फास्ट ध्वनिमुद्रित होतं. मजा तर येतेच पण जुन्या काळातली मजा अलाहिदा !!!!!

पण, या ही जमान्यात असे काही "संगीत वेडे" हो वेडेच म्हणावं लागेल असे संगीतकार असतात, अगदी मागच्याच वर्षी याची प्रचिती आली, असा एक संगीतकार वल्ली माणूस मला भेटला, त्यांचं नाव आहे श्री. विनय राजवाडे.

एका शीर्षक गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी आमची चर्चा झाली त्यांनी केलेल्या एका लाईव्ह रेकॉर्डिंग बद्दल. आणि मी सहजच त्यांना म्हटलं की आम्हाला पण अशी संधी मिळाली तर किती मस्त अनुभव असेल तो. हे त्यांनी लक्षात ठेवलं आणि एक दिवशी मला फोन केला. "आपण कविवर्य वसंत बापटांचं महाराष्ट्र गीत ६० वादकांसहित लाईव्ह रेकॉर्ड करतोय; यश राज स्टुडिओ मध्ये - तू गाशील का त्यात ?"  मला कुणीतरी चिमटा काढायचा बाकी होता कारण हे स्वप्नच होतं.

त्या सगळ्या प्रोसेस चं वर्णन करण्यासाठी पुन्हा एक नवा लेख लिहावा लागेल पण, या अद्भुत गाण्याच्या तालमी, त्या संदर्भातल्या भेटीगाठी, रेकॉर्डिंग चा तो अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस हे सगळंच स्वप्नवत होतं


तुम्ही ते गाणं ऐकाल तेव्हा तुम्हालाच लक्षात येईल की आम्ही सगळ्यांनी किती मजा केली असेल. विनायजींचे लाख आभार की त्यांनी याचा एक भाग मला बनवलं. श्री. अमोल धर्मे यांनी ते गाणं बनवण्यात आर्थिक पाठबळ दिलं त्यांनाही सलाम कारण आजच्या काळात हे शिवधनुष्यच !! 



जेष्ठ  संगीतकार आणि गुरुतुल्य असे श्री अशोक पत्की सर यांच्या हस्ते या गाण्याचं अनावरण झालं. तो क्षण अविस्मरणीय ठरला.... 

या लेखासोबत गाण्याची लिंक देतोय. त्यावर नक्की क्लीक करा आणि अनुभवा लाईव्ह रेकॉर्डिंग केलेल्या गाण्याची सुरेल अनुभूती.




Author Note: The BnW images used in this blog are sourced from the internet & 
                        There is no intention to infringe upon any copyright. 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"श्रेया घोषाल" - बस नाम ही काफी है !!!!!

"कमलेश भडकमकर - एक मॉडर्न अवलिया"

कलाकारांचं आर्थिक नियोजन